Thursday, March 29, 2012

खाद्य भ्रमंती भाग २


पुण्यातील पेठान मधून फिरताना मी जरा भावूक होऊन जातो... सदाशिव , नारायण , शानिवारातील ते जुने दिवस समोर उभे राहतात ..काळा च्या ओघात  पुसल्या  गेलेल्या पण  ओळखीच्या वाटणार्या खुणा शोधत .... ते जुने वाडे , गल्ल्या , बोळ  मनात परत बांधत  मी तासंतास मनसोक्त फिरतो ... ओळखीच्या चवी आणि ते तसेच ओळखीचे वाटणारे लोक भेटले कि देह भान विसरायला होते ..
दगडूशेठ संगीत उत्सवा च्या निमित्ताने असेच परत रामणबागेत जाण्याची संधी मिळाली आणि मी खाद्य भ्रमंती ला सुरवात केली ...
( ह्या पूर्वी ची खाद्य भ्रमंती, पुणेरी मिसळ , अमृततुल्य   )
प्रभा विश्रांती गृह हे म्हणजे अस्सल पुणेरी दुकानाचा नमुना आहे ... मालकाला त्याच्या मालाचा प्रचंड अभिमान , येणारे  गीर्हाईक  हे केवळ आपला माल अद्वितीय आहे म्हणून येते हि खात्री .. कस्टमर सॅटीसफॅक्षन वैगरे क्षुल्लक बाजारी गोष्टीन कडे काना डोळा करत मस्त पैकी गल्ल्या वर बसणारे मालक बघायचे असतील तर प्रभा विश्रांती गृहा ला जरूर भेट द्यावी .. आवर्जून बटाटे वडा खावा ! मग आपल्याला समजतं कि चांगलं प्रोडक्ट असलं कि मालक का एवढा "माज " करू शकतो ते ! बटाट्या वड्या  बरोबर पाव आणि रस्सा ..थोडी मिसळ .. जमलंच तर साबुदाणा वडा हे ओघाने आलेच ..
पूर्वी इथे बटाटा कचोरी मिळायची ती आता बंद केली आहे मालकाने ...ओलं खोबरं आणि बटाट्याचे आवरण असलेली हि कचोरी म्हणजे प्रभा विश्रांती गृहा चा ट्रेड मार्क होती !
 रमण बागे कडून लक्ष्मी रस्ता ओलांडला कि  कुमठेकर रस्त्या ला माझ्या लहानपणी एक खाद्य मेजवानी असायची .. पेशवाई .. सुजाता ..मधे विश्वेश्वराचं मंदिर ..दोन पाण्यानी भरलेले ..मोठ्ठे... मासे तरंगत असलेले दगडी हौद ..पुढे  स्वीट होम ..
ह्या पैकी  आता फक्त स्वीट होम उरलं आहे त्याच्या नव्या वेशात .. न्यू स्वीट होम ..इथलं इडली-सांबार शेव अजून हि ती जुनी चव टिकवून आहे ... इडली सांबार घेताना आवर्जून शेव प्लेट घ्या व सांबारा वर तवंग जरा कमी टाकायला सांगा.. शेवटी एक प्लेट दहीवडा खायला विसरू नका...
पुढे उजवी कडे वळल्या वर "श्री मिसळ" हे प्रसिद्ध खाऊ-ठिकाण आहे .. इथे काय काय म्हणून खाऊ असं होतं ... कोकणी ओल्या नारळाची चव इथल्या प्रत्येक पदार्थात आहे .. मिसळ , साबुदाणा वडा , रस्सा , आणि विशेष म्हणजे इथे मिळणारी हिरवी नारळ-मिरची ची चटणी ..
वरील पैकी कुठल्याच ठिकाणी चांगला चहा मिळत नसल्या मुळे ... चहा साठी .. पेरुगेट रस्त्या वरील ... नर्मदेश्वर , व्याडेश्वर  पैकी कुठल्या "अमृततुल्यात " जाणं हे ओघाने आलेच ....
तोच रस्ता पुढे रमण बागे कडे घेवून येतो... खाण्या नंतर गाणं ऐकायला नको ?

आज आहे जसराज ... उद्या शौनक अभिषेकी .. आणि १ एप्रिल ला हृदयनाथ !

Thursday, March 22, 2012

पुण्यात नव्या वर्षाचे स्वागत विविध संगीत मैफिलीतून


२२ मार्च संध्या ६.३० : विजय कोपरकर  (गरवारे कॉलेज )

२३ मार्च पहाटे ६.३० : श्रीधर फडके गुढी पाडवा पहाट :गीत रामायण  ( बाल शिक्षण मंदिर , कोथरूड )

२३ मार्च संध्या ६ : शंकर अभ्यंकर : धन्य धन्य शिवराय  ( विवेकानंद सभागृह , एम आय टी )

२३ मार्च ते २५ मार्च  रोज संध्या ५.३० : पं जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव  ( घरकुल लॉंन्स )
( मुख्य आकर्षण .. मोहन दरेकर , रोणू मजुमदार , फ्युजन संगीत )

२३ मार्च - २४ मार्च  संध्या ६ : सुदर्शन संगीत महोत्सव - बंदिशकार  उत्सव  ( सुदर्शन रंगमंच )

२४ मार्च संध्या ६ : चिमणराव ते गांधी  : दिलीप प्रभावळकर बहुरूपी टॉक शो (कर्नाटक स्कूल सभागृह )

२५ मार्च संध्या ५.३०  : "आलाप "  ( कर्नाटक स्कूल सभागृह )

गुढी पाडवा ते राम नवमी : रोज संध्या ६  : दगडूशेठ संगीत उत्सव   ( रमण बाग )
( मुख्य आकर्षण : जसराज , हृदयनाथ , शिवकुमार शर्मा  आणि अनेक दिग्गज )

Tuesday, March 20, 2012

उन्हाळ्यातली खाद्य भ्रमंती ...


उन्हाळा जाणवायला लागला आहे तसं  निरा , लिंबू सरबत , जीरा- सोडा , ताक, झालच तर थम्बस अप , माठातलं थंड गार पाणी , कैरी पन्हं  असले स्टॉल्स गावात जागो जागी बघायला मिळत आहेत ... पण माझं लक्ष वेधून घेतलं ते नव्याने निघालेल्या "सोडा - शॉप " नी .. ह्या दुकानात ९० प्रकारचे सोडा फ्लेवर्स मिळतात ... मला आवडलेले फ्लेवर्स म्हणजे .. पान फ्लेवर , कोका -कोला फ्लेवर , कॉफी-बीअर ... अजून बरेच फ्लेवर चाखून बघायचे आहेत .. उन्हाळा संपे पर्यंत सगळे ९० फ्लेवर होतील चाखून !
बरेच  दिवसात  "जनसेवा" त गेलो नव्हतो .. आज जाण्याचा योग आला ... जनासेवाची ट्रेड मार्क असलेली ... बाटलीत मिळणारी लस्सी आजकाल मिळत नाही ... पण "जनासेवा" चा झालेला "मेकोवर " पाहून मन प्रसन्न झालं ... बोलता बोलता बरचं खाणे झाले... दडपे पोहे, निखट सांजा ,कांदे पोहे , कांदा-बटाटा रस्सा पुरी , श्रीखंड -पुरी , बटाटे वडा, मॅन्गो लस्सी ..
नव्या युगाशी जनसेवा नी स्वतः ला जमवून घेतलं आहे... स्वच्छता , अस्सल पुणेरी - मराठी पदार्थ  आणि चव हे जनसेवा नी अगदी पूर्वी पासून .. अगदी "जनसेवा दुग्ध मंदिर" असल्या पासून जोपासलं आहे.
नव्या जमान्या शी जुळवून घेत सेल्फ सर्विस ची एक वेगळी पद्धत , क्रोकरी हि "चायनीज टेक अवे " पद्धतीची , बँकेत असते तशी कुपन सिस्टीम , डिस्पोजेबल ग्लास , चमचे इ ... सगळ बघून जुन्या जनसेवे ची आठवण  मला आली ते काही नवल नाही ...  ऑरडर दिल्यावर १५ मिनिटे  थांबवायची प्रथा मात्र सच्च्या पुणेकरा सारखी राखली आहे ...
जनासेवातच एक अतिशय दयनीय असा प्रसंग अनुभवास आला... एक वयस्कर जोडपं आपल्या ४-५ वर्षाच्या   ( एन आर आय ) नातवा ला घेवून बसलेले दिसले . तो नातू म्हणजे एक अतिशय लाडावलेला कार्टा आहे हे जाणवत होतं .... इंग्रजीत ज्याला "अब्नोक्षिएस " म्हणतात तसं होतं ते कार्ट.... सारखं त्या आज्जी-आजोबांना ओरडत होतं आणि चिकन-सॅन्डव्हीच  मागत होतं... बोली वरून म्हातारा म्हातारी अस्सल "एकारांती" वाटत होती ..थोडे लाजल्या सारखे वाटत होते .. "तसलं" काही खात असतील असे वाटत नव्हते .. पण ते कार्ट काही केल्या आज्जी - आजोबांचे ऐकत नव्हते .. काहीही व्हेज खायला तयारच नव्हते ... आजोबां कडे बघून त्यांचा त्यांच्या नातवा बद्दल झालेला भ्रम निरास जाणवत होता !



Sunday, March 18, 2012

देऊळ


देऊळ ..एकदम आवडला ..तिरकस विनोदि ..पण झोंबणारं सामाजिक सत्य अतिशय सहज रित्या दाखवणारा चित्रपट .... स्क्रिप्ट आवडली !
गिरीश कुलकर्णी च काम  आवडलं !
सोनाली कुलकर्णी  भूमिके  मध्ये पूर्ण पणे शिरल्या सारखी वाटते ,"अप्सरा आली" मधली हीच का ती मादक अप्सरा ? का तिचं हे  अस्सल गावरान रूप ? झकास झालं आहे काम !
दिलीप प्रभावळकर आता प्रत्येक भूमिकेत "प्रेडिक्टेबल" झाला आहे ! कुठल्या हि चित्रपटात दिलीप प्रभावळकर त्याच वेशात -भूमिकेत जाणवतो.
नाना पाटेकर कधी नव्हे तो मला आवडला . नेहमीचा  चीड-चीड्या, जगाला कंटाळलेला नाना "हटके " भूमिकेत लक्ष वेधून गेला !

बोचरा विनोद ...जो एक प्रकारे टीका करण्यासाठी अतिशय प्रभावी अस्त्र बनू शकतो, त्याचा सुंदर वापर दिग्दर्शक, स्क्रीन -प्ले , स्क्रिप्ट -रायटर  यांनी केला आहे !

गेल्या  दोन-तीन  दिवसात बरेच  मराठी सिनेमे बघून झाले .. शाळा , देऊळ , मुंबई-पुणे-मुंबई , फक्त लढ म्हणा, झेंडा , झकास ,तरुण तुर्क -म्हातारे अर्क , बालगंधर्व ...   देऊळ एक चांगला अनुभव वाटला !

  

शाळा


शाळा ..पुस्तक वाचलं नव्हतं ... सिनेमा ला अनेक  बक्षिसं मिळाली म्हणून बघितला ... पुस्तक वाचलं नव्हतं हेच बरं ...

जोशी चं काम आवडलं
शिरोडकर खुपच छान आणि गोड वाटली
जितेंद्र जोशी च काम आवडलं


कालच मी इंग्रजी मध्ये एक पोस्ट लिहिली होती ... मालगुडी डेज आणि वंडर इयर्स बद्दल ...सारखं कुठेतरी  "शाळा " , "मालगुडी डेज " , "वंडर इयर्स " मध्ये  कुठे तरी साम्य वाटलं
सिनेमा आवडला ..यंग रोमांस ..बाल कलाकारांचं  काम मस्त आहे ..
इमोशनल टच  मुळे पटकन आवडून गेलेला
कधीतरी शाळेत गेलेल्यानी  आवर्जून बघण्या सारखा सिनेमा

Friday, March 16, 2012

पु ल प्रेमींना आवाहन


पुलं च्या साहित्यात , व्यक्ती आणि वल्ली ह्या पुस्तकात भेटलेली अनेक व्यक्तिचित्रे  घेवून एक संहिता ( स्क्रिप्ट) लिहायला घेतली आहे.प्रायोगिक  स्तरा वर आणि पुल प्रेमी "हौशी" साहित्तिक एकत्र जमून ,एक ग्रुप म्हणून असं स्क्रिप्ट  लिहिण्याचा मानस आहे ..
पुलं च्या साहित्या चे अनेक प्रेमी पुण्यात आहेत.. अनेक अभ्यासक हि आहेत .. प्रत्येक व्यक्ती चित्रात एक स्वतंत्र संहिता आहे ... जर असे हौशी साहित्तिक आठवड्यातून एकदा  एकत्र बसून चहाचा घोट घेत ..आपली प्रतिभा कागदावर उमटवू शकले तर फार मजा येईल. निदान सर्व पुलं साहित्य प्रेमींचा एक कट्टा तरी नक्की जमेल !
अशा प्रकार च्या विचारातून मी पुण्यातील पुल प्रेमींना एक आवाहन करत आहे ..
असा हौशी साहित्तीकांचा कट्टा पुण्यात (च !) भरू शकतो ... असा कट्टा जमवण्याची माझी इच्छा आहे . जर  कोणाला अशा प्रकारच्या "गृपिझम " मध्ये भाग घेण्याची इच्छा असेल तर माझे त्यांना आग्रहाचे निमंत्रण !
ह्या पोस्त ला उत्तर म्हणून आपला अभिप्राय कळवा ... ट्विटर किंवा इमेल ने कळवले तरी चालेल.
शनिवार / रविवार /गुरुवार ह्या पेकी कुठला दिवस जमू शकेल ते हि कळवा

जर तुमचा एखादा "पुलं साहित्य प्रेमी " मित्र / मैत्रीण अश्या उपक्रमात भाग घेण्यास इच्छुक असेल तर कृपया त्यांना हि जरूर कळवा  हि कळकळीची विनंती !



Wednesday, March 14, 2012

मुढचेता नराधम

अनाहूता प्रविशन्ति अपृच्च्हो बहुभाष्यते
अविश्वसते विश्वासिती ,मुढचेता नराधम !

बोलावण्या विना जो घरात येतो ... न विचारता खूप बोलतो ... ज्यांच्या वर विश्वास ठेवायला नको असल्या लोकान वर विश्वास ठेवतो ....असा माणूस मृत बुद्धीचा व अधर्मी समजावा   !





Monday, March 12, 2012

थेंब


मनांत नाही
मुळीच माझ्या कांहि ;
फक्त वाजते आहे :
नितळ लाजरे ओले पाउल
एक चिमुकल्या थेंबाचे.

पाडगावकर
१९५३



Sunday, March 11, 2012

रिपू दमनाचा आई भवानी आम्हाला वर दे

गेल्या काही दिवसात अनेक जुने सिनेमे व नाटकं पाहण्याचा योग आला : वासुदेव बळवंत फडके ,घाशीराम कोतवाल, रायगडाला जेव्हा जाग येते ,हि श्रींची इच्छा ,इथे ओशाळला मृत्यू ,रणांगण ...आणि  २२ जुने १८९७

"गोंद्या आला रे  ...गोंद्या आ ..ला रे"
२२ जुने १८९७ मधील हे  शब्द ऐकले कि अंगा वर एक विचित्र  शहारा असा येतो...उसळून येते रक्त .....

" धुमसतात अजुनि विझल्या चितांचे निखारे
  अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे " 

शंभर वर्षान वर उलटून गेली तरी अजून परिस्थिती काही फार वेगळी नाही ... गोरे जाऊन काळे आले ... एवढाच  काय तो फरक.. आज असे "रँड" सर्वत्र दिसताहेत .. चाफेकर मात्र विरळच .. कधी कधी वाटतं .. व्यर्थ गेलं ह्या वीरांच बलिदान ..  वासुदेव बळ वंतानी सांगितलेले शेवटचे शब्द हि तंतोतंत तसेच खरे होत आहेत...

" आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेत ही ना वाली
  अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली ! "




नपुसक मराठे दिल्लीत जाऊन कुठल्या इटालीयन बाई चे तळवे चाटताहेत .. शिवाजी तानाजी ची वंशावळी सांगणारे आज इतिहास विसरून मुजरे करताहेत यवनांचे !   दळभद्री  नार्या  "मातोश्री " सोडून इटा लीयन झगे धुतो आहे ... राज्यात अनेक पिसाळ लेले "सूर्याजी " आणी माजलेले "भुजबळ" स्वतः च्या पिल्लांना घेवून मोकाट फिरत आहेत .. वाघाच्या पिल्लांवर भुंकण्याची हिम्मत करत आहेत ...
बाहेरील अनेक बांडगुळं आमच्या भूमिपुत्रांना लुटत आहेत आणि "कृपा " करून करोडो जमवत आहेत ..
महाराष्ट्रातील युवक मात्र झिंगलेल्या अवस्थेत निद्रस्थ आहे ... गाणी - बजावणी -नाच - सासू सुनेच्या रडक्या सिरिअल्स - फेसबुक  ह्या मध्ये मश्गुल आहे ...

"आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली
 अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली "

नुसत्या शिवजयंती उत्सवाच्या मिरवणुका काढून बाकीचे वर्षभर "येरे माझ्या मागल्या " असे करून उपयोग नाही ... नव्या समाजाची .. नव्या राष्ट्र निर्माणाची  ... महाराष्ट्र निर्माणाची ज्योत तेवत ठेवणे महत्वाचे आहे !
क्रांती चे निखारे धग-धग तील आणि  वणवे पेटतील ...   लवकरच  हि झोपलेली युवा शक्ती जागी होईल.... आणि बोथट झालेल्या ..गंजलेल्या तलवारिना धार लावेल ...यवनांना परतवून लावेल... माजलेल्या राज्य कर्त्यांना जागा दाखवेल ... 
अश्या नव्या महाराष्ट्र निर्माणाचे ,राष्ट्र निर्माण करण्याचे व्रत घेणाऱ्यांसाठी अनेक शुभेच्छा  आणि आई जगदंबे  समोर प्रार्थना 

आई आंबे जगदंबे जातो सत्कर्मी ..जयदे 
रिपू  दमनाचा आई भवानी आम्हाला वर दे 

आम्हा नाही तुझ वाचोनी कोणी जगी आसरा 
पुण्य पतनी धर्म बुडविला रँडा ने सारा 

रिपू दमनाचा आई भवानी आम्हाला वर दे !







Saturday, March 3, 2012

जिप्सी


एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून

होते बोलत पंतोजी उग्र रोखून नजर
पण ठरेचना मन चार भिंतीच्या जगात
उडे खिडकी मधून दूर दूरच्या ढगात
झाडे पानांच्या हातांनी होती मला बोलावीत

कसे आवरावे मन ? गेलो पळून तिथून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून

आणि पुढे कशासाठी गेलो घर मी सोडून ?
सारी सारी सुखे होती , काही नव्हतेच न्यून
पण खोल खोल मनी कुणी तरी होते दुः खी
अशा सुखात  असून जिप्सी उरला असुखी

वातासावे त्या पळालो सारे काही झुगारून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून

घर असूनही आता घर उरलेले नाही
चार भिंतींची जिप्सीला ओढ राहिलेली नाही
कुणी सांगावे ? असेल पूर्व जन्मीचा हा शाप
घडी सुस्थिरपणाची विसकटे आपोआप ...

कुणी तरी साद घाली दूर अनंतामधून ..
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून


कवी मंगेश पाडगावकरांची १९५२ साली लिहिलेली .. " पाडगावकर " शैलीत  नसलेली  जिप्सी ह्या कविते तील काही निवडक ओळी !  ( हि कविता सुधीर मोघ्यांनी लिहिली आहे असे कोणी  सांगितले तरी  नक्की विश्वास बसेल !)